मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली श्रीक्षेत्र भीमाशंकर येथील प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’ जागेची पाहणी
भीमाशंकरच्या धार्मिक आणि पर्यावरणीय समतोल राखत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात (Bhimashankar) आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया तसेच स्थानिकांसाठी प्रस्तावित सुविधांची याबाबतची माहिती त्यांनी घेतली. ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, वन विभागाचे अधिकारी तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहणीदरम्यान प्रकल्पातील विविध घटक, पुनर्वसन प्रक्रिया, स्थानिकांच्या अपेक्षा तसेच भाविकांसाठी प्रस्तावित सुविधांचा सविस्तर आढावा घेतला. भीमाशंकरच्या धार्मिक आणि पर्यावरणीय महत्त्वाचा विचार करून विकास आणि संवर्धन यांचा समतोल राखत प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
हिडन चार्जेसमुळे भारतीयांचे 28 हजार कोटी गेले; ऑनलाईन खरेदी करणाऱ्यांना घाम फोडणारा रिपोर्ट
‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पामुळे भीमाशंकरच्या सांस्कृतिक वारशाचे जतन, ग्रामस्थांच्या जीवनमानात सुधारणा, भाविकांसाठी दर्जेदार सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना मिळेल आणि परिसराचे परिवर्तन घडून येईल, असा विश्वास यावेळी फडणवीस यांनी व्यक्त केला. ग्रामस्थानी प्रकल्पासाठी केलेल्या सहकार्याचा मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला. परिसरातील १५० घरांना इतरत्र जागा देऊन चांगल्या गावाची रचना करण्यात येत आहे, जेणेकरून भाविक मंदिरासोबत गावातही जातील आणि गावाची अर्थव्यवस्था बदलेल. रस्ते, ज्येष्ठ नागरिकांसाठी विद्युत वाहन, दुकानांची रचना, बस स्थानक आदींचे उत्तम नियोजन करण्यात आले आहे. इथे करण्यात येणाऱ्या सुविधेमुळे भाविकांची संख्या वाढेल, असंही फडणवीस म्हणाले.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी प्रकल्पाची माहिती दिली. ते म्हणाले, भीमाशंकर गावाचे नियोजित पुनर्वसन, भाविकांसाठी आधुनिक सुविधा आणि स्थानिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. मूळ गावापासून अवघ्या १५० मीटर अंतरावर सुमारे १०.५ एकर क्षेत्रात ‘हेरिटेज वाडी’ विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये पारंपरिक वास्तुशैली आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधण्यात येणार आहे. स्थानिकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ४० हून अधिक व्यावसायिक युनिट्सची तरतूद करण्यात आली आहे.
‘विस्थापनाऐवजी पुनर्रचना’ या संकल्पनेवर आधारित हा प्रकल्प असून ग्रामस्थांचे सामाजिक व सांस्कृतिक नाते अबाधित ठेवत जवळच्या परिसरातच पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. प्रस्तावित ‘हेरिटेज वाडी’मध्ये वारसा प्रवेशद्वार, ग्रामपंचायत कार्यालय, सामुदायिक सभागृह, सार्वजनिक सुविधा केंद्र तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत.
‘लाइव्हलीहुड अपग्रेडेशन’ संकल्पनेअंतर्गत नव्या वसाहतीचे नियोजन भाविक व पर्यटकांसाठी सेवा केंद्र म्हणून करण्यात येत असून त्यामुळे स्थानिकांना पर्यटनाशी संबंधित विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, मंदिर परिसरातील जवळपास १०० टक्के रहिवाशांचे नियोजनबद्ध पुनर्वसन करण्यासाठी ‘झिरो फ्रिक्शन मॉडेल’चा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधा अधिक प्रभावीपणे राबविता येतील.